असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल
राजकारण

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. अतिवृष्टीनंतर तब्बल  दोन महिन्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आलं आहे. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. इतकंच नाही तर दोन महिन्यांनी येणाऱ्या केंद्रीय पथकावरही त्यांनी टीका केली आहे. “महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिने सहा दिवसांनी केंद्रीय पथक आलं आहे. आता शिवारात जाऊन ते काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल फसल तो बहुत अच्छी है इनको मदत करनेकी जरुरत नहीं” असं म्हणत राजू शेट्टींनी केंद्रीय पथकावरही टीका केली आहे.

दरम्यान, दोन महिन्यापूर्वी आधी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाचा फटका यामुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नगदी खरीप व भाजीपाल्याच्या पिकांची तसेच फळबागाची प्रचंड नासाडी झाली. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, धानासोबतच भाजीपाल्याची पिके तसेच विदर्भातील संत्रा, मोसंबी व उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष व केळीचीही प्रचंड हानी झाली आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर निर्भर आहे. या नैसर्गिक संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यावेळी राज्यसरकारने केंद्र सरकारला नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र तब्बल दोन महिन्यांनी हे पथक आल्यामुळे राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.