आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा
राजकारण

आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा

पटना : भारतीय जनता पक्षाने आपला बिहारमधील मित्रपक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. जयदूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत जदयूमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी यांनी यावर थेट माध्यमांसमोरच प्रतिक्रिया दिली आहे. हे आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचं त्यागी यांनी म्हणत भाजपला इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जदयूच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाहीत. असं के सी त्यागी यांनी म्हटलं आहे. पटना येथील पत्रकारपरिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच, बिहारमधील आघाडीबाबत काही वाद नाही. अरुणाचलमधील घटनेचा बिहारमधील राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. असे देखील यावेळी केसी त्यागींनी स्पष्ट केले.

यावेळी जदयूचे सरचिटणीस के सी त्यागी यांनी लव्ह जिहाद बाबत देखील भूमिका स्पष्ट केली. लव्ह जिहादच्या नावाखील देशात द्वेष व फूट पाडण्याचे वातावरण निर्माण होत आहे. घटना आणि सीआरपीसीच्या तरतुदींमुळे दोन प्रौढांना एखाद्याच्या धर्माचा किंवा जातीचा विचार न करता त्यांच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते, असेही त्यागी म्हणाले.