औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही पक्षांनी नामांतराला पाठिंबा दिला आहे. तर, काँग्रेसनं कडाडून विरोध दर्शवला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असं आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रामदास आठवले हे सध्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असून केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. भाजपचा ‘संभाजीनगर’ला पाठिंबा असताना आठवले यांनी घेतलेली विरोधी भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

राज्यातील महाविकास आघाडीतील एक पक्ष काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर करताना नामांतराला विरोध केला आहे. ‘शहराचं नाव बदलून विकास होत नाही. काँग्रेसचा भर लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आहे. औरंगाबादच्या नामांतराचा विषय अद्याप चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल तेव्हा काँग्रेस भूमिका मांडेल. नाव बदलण्यास आमचा ठाम विरोध आहे’, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं होतं. त्यामुळं नामांतरासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. ही संधी साधून विरोधी पक्ष भाजपनं ही मागणी रेटून धरली आहे. तसंच, शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणाऱ्या मनसेनंही नामांतराच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेसवर ‘संभाजीनगर’ असे फलकही लावले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली आहे.