संभाजी राजेंचा शरद पवारांना इशारा; छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर…
राजकारण

संभाजी राजेंचा शरद पवारांना इशारा; छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर…

मुंबई : ”छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे” असे सांगत खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘सारथी जिवंत ठेवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन शेवटची विनंती करणार आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, आता सारथी संस्थेमार्फत राबविला जाणार तारादूत प्रकल्प बंद पडला आहे. तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी पुण्यातील सारथी कार्यालय बाहेर मागील सहा दिवसापासून सेवक बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज खासदार संभाजीराजेंनी आंदोलक तारादूतांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, “सारथी संस्थेच्या माध्यमातून राबविला जाणारा तरदूत प्रकल्प मागील कित्येक महिन्यापासून बंद आहे. या प्रकल्पांतर्गत काम करणार्‍या सेवकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या मागणीसाठी सहा दिवसापासून सेवक सारथी संस्थेबाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. मात्र याकडे या महा विकास आघाडी सरकारने दखल देखील घेतली नाही. ही निषेधार्थ बाब असून या प्रश्न मी लवकरच शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. पण ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था सुरू केली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे शरद पवार साहेब आपण छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल, तर ही सारथी संस्था जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी आहे” अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच, सारथी संस्थेला स्वायत्तता देणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विभागाने सारथी संस्थेला स्वायत्तता प्रदान केली. मात्र ‘सारथी’चे अधिकारी कलम २५ च्या माध्यमातून आम्हाला स्वायत्तता असल्याचे सांगत आहेत. मग कसली स्वायत्तता,’ असा सवाल करत आंदोलनकर्त्यांसाठी रस्त्यावर पुन्हा उभे राहावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.