शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; देवेंद्र फडणवीसांची आरोप
राजकारण

शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; देवेंद्र फडणवीसांची आरोप

मुंबई : शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, की परमबीर सिंह यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती.” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज महाविकासआघाडी सरकारचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील तत्काळ पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”आज शरद पवार यांची पत्रकारपरिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत. त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. वझेंची नियुक्ती सिंह यांनी केल्याचं पवारांनी सांगितलं. ते खरं आहे. पवारांनी सत्य सांगितलं. पण ते अर्धसत्य आहे. सिंह यांच्या समितीनेच वझे यांना पदावर घेतलं. मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतरच त्यांनी वझे यांना पदावर घेतलं होतं. हे सत्य असून पवारांनी हे सत्य सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

शरद पवार म्हणतात ते अर्धसत्य आहे, हे खरच आहे परमबीर सिंह यांच्याच समितीने वझे यांचं निलंबन रद्द करून, त्यांना पदावर घेतलं. पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने व निर्देशाने हे काम परमबीर सिंह यांनी केलं आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि नंतर त्यांनी काय केलं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे.” असं देखील फडणवीस म्हणाले.

मात्र हे सर्व घडण्याची हि पहिलीच वेळ नाही, या पूर्वी महाराष्ट्राचे महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी देखील या संदर्भातील रिपोर्ट हा राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे. पोलिसांच्या बदल्यांमधलं रॅकेट पैशांची देवाणघेवाण त्यातली दलाली, या संदर्भातील संपूर्ण ट्रान्सक्रीप्टसह एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी सादर केला होता. तेव्हाच्या कमिशनर इंटलिजन्सच्या माध्यमातून तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यानंतर तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही.” असं फडणवीस म्हणाले.