पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला
राजकारण

पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला

नाशिक : “देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी जळगाव पालिका निकालांवरून भाजपाने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ”जळगाव पालिका निवडणुकीत शिवसेनेनं घोडेबाजार केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. त्यावर “घोडेबाजाराचा आरोप कुणी कुणावर करावा? भाजपानं याआधी घोडेबाजार केला नाही का? पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?”, असा उलट प्रश्न राऊतांनी केला आहे.

तर कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आपली भूमिकाही मांडली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”देशात सोनिया गांधी यांनी आत्तापर्यंत युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली. मात्र सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. त्यामुळे आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतंय.”