हमको तो बस तलाश नए रास्तो की है; संजय राऊतांच्या ट्वीटने तर्कवितर्कांना उधान
राजकारण

हमको तो बस तलाश नए रास्तो की है; संजय राऊतांच्या ट्वीटने तर्कवितर्कांना उधान

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे आता भाजपाही आक्रमक झाली आहे. या राजकीय परिस्थिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राऊत यांनी जावेद अख्तर यांचा शेर ट्विट केला असून, त्याचे वेगवेगळे अर्थ आता लावले जाऊ लागले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांचा शेर ट्विट केला आहे. “हमको तो बस तलाश नए रास्तो की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है” असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे या ट्विटमधून राऊत यांना नेमकं काय म्हणायचं? या ट्विटमधून राऊत काय संकेत देत आहेत, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी पाठवलेल्या पत्रानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.

या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. या आरोपांमुळे आता राज्यसरकारचं पुढचं पाऊल काय असेल? अशी चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर, व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यासह मुंबई पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले होते. या भेटीत आपण गृहमंत्र्यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. देशमुख यांच्या आर्थिक मागण्या, पोलीस कारभारातील वाढता हस्तक्षेप याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिली होती. बहुतेक बैठकांना काही मंत्री उपस्थित होते. त्यांना देशमुख यांच्या वर्तनाची पूर्व कल्पना होती, असा दावाही सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला.