सिडनी : दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखली. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली.
🏏 A magical day of Test cricket saw India save the game after battling it out against Australia for 97 overs.#AUSvIND REPORT 👇
— ICC (@ICC) January 11, 2021
पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीनं १६१ चेंडूचा सामना केला. तर अश्विननं विहारीला संयमी साथ देत १२८ चेंडूचा सामना केला. एकवेळ भारतीय संघ सामना गमावेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या जोडीनं संयमी आणि चिवट फलंदाजी करत २५९ चेंडूचा सामना करत भारताचा पराभव टाळला. ऑस्ट्रेलियानं विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी पराकोठीचे प्रयत्न केले. कर्णधार पेन यानं तर स्लेजिंगचाही वापर केला. मात्र, अश्विन-विहारी यांनी आपला संयम ढासळू देता भारताचा पराभव टाळला. यांच्या फलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.
भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला. पण त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.
ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी यांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली. रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होता. त्यातच भर म्हणून हनुमा विहारीला दुखापत झाली. हनुमा विहारीला धावणेही कठीण झालं होतं. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीनं सामना वाचवण्याच्या दृष्टीनं फलंदाजी केली. अश्विन-विहारी यांनी संयमी फलंदाजी करत अखेर सामना वाचवला. विहारीनं नाबाद २३ तर अश्विननं नाबाद ३९ धावांची खेळी केली.