नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा आगामी टी-२० विश्वचषकानंतर कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे बीसीसीआय पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारताचे माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेना परत आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
२०१७ मध्ये कुंबळे यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर विराट कोहलीने २०२१च्या टी २० वर्ल्डकपनंतर आपण भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे असे गुरुवारी जाहीर केले आहे. माजी कर्णधार आणि दिग्गज लेग स्पिनर कुंबळे यांनी २०१७ मध्ये कोहलीसोबत गंभीर मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते.
कुंबळे चार वर्षांपूर्वी मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर कोहलीने रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्याबाबत पाठिंबा दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पॅनलच्या शिफारशींनंतर कुंबळेंना परत आणण्याचे मार्ग शोधले जात असल्याचे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली कोहलीच्या मतभेदांनंतरही २०१७ मध्ये कुंबळेंना प्रशिक्षक पदावर कायम ठेवण्यासाठी इच्छित होते असे मानले जाते होते. त्यावेळी सौरव गांगुली बीसीसीआयच्या क्रिकेट सुधार समितीचे (सीआयसी) सदस्य होते. कुंबळे यांची जून २०१६ मध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली २०१७च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.