भारताची पुन्हा खराब सुरवात; पहिल्या टी-२० सामन्यात दारुण पराभव
क्रीडा

भारताची पुन्हा खराब सुरवात; पहिल्या टी-२० सामन्यात दारुण पराभव

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेनंतर टी-२० स्पर्धेला सुरवात झाली आहे. कसोटीप्रमाणेच मालिकेच्या सुरवातीला भारताला पराभवाला सामोरे जावे लागले असून पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडकडून भारताचा दारून पराभव झाला आहे. विजयासाठी १२५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं. यामध्ये सलामीवीर जेसन रॉयनं केलेल्या ३२ चेंडूत ४९ धावांचा मोठा वाटा होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जेसन रॉय (४९) आणि जॉस बटलर (२८) या दोघांनी इंग्लंडला ७२ धावांची दणदणीत सलामी दिली. आपला १००वा सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलनं आठव्या षटकामध्ये जॉस बटलरला पायचीत करून टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यापाठोपाठ १२व्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला पायचीत करून माघारी धाडलं. मात्र, तोपर्यंत या दोघांनी सामना इंग्लंडच्या बाजूने पूर्णपणे झुकला होता. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आलेल्या डेविड मलान(२४) आणि जॉनी बेयरस्टो(२६) यांनी हातात आलेल्या इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासोबत इंग्लंडने मालिकेत १-० आघाडी घेतली.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धावफलकावर २ धावा असताना भरवशाच्या के. एल. राहुलला जोफ्रा आर्चरनं बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनं देखील तंबूत परतला आणि भारताची अवस्था २ बाद ३ धावा अशी झाली. शिखर धवनला (४) देखील पाचव्या ओव्हरमध्ये भारताच्या २० धावा झालेल्या असताना वूडनं माघारी धाडलं. रिषभ पंत (२१) आणि श्रेयस अय्यर (६७) यांनी भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. १०व्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सनं पंतला बेयरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर हार्दिक पंड्या (१९) आणि श्रेयस अय्यर यांनी ५४ धावांची भागीदारी करत भारताला १००चा आकडा गाठून दिला. हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर शार्दूल ठाकूर(०) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (३) आणि अक्षर पटेल (७) यांनी भारताला १२४ धावांपर्यंत मजल मारून दिली.