रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय
क्रीडा

रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय

नवी दिल्ली : भारताचा इंग्लंड दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहते निराश झाले होते. आता या सामन्यांविषयी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून याबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने एक निर्णय घेतला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीच्या जागी २०२२मध्ये भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यात पुढील वर्षी एक कसोटी सामना खेळण्यासाठी करार झाला आहे. भारतीय संघाला पुढील वर्षी एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करायचा आहे आणि त्या दरम्यान हा कसोटी सामनाही खेळला जाईल.

बीसीसीआय आणि ईसीबीने सहमती दर्शवली आहे, की पुढील वर्षी मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान या कसोटी सामन्यासाठी वेळ ठरवली जाईल. दोन्ही मंडळांनी अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर, हा सामना सध्याच्या मालिकेचा भाग असेल किंवा तो मालिकेपासून वेगळा ठेवला जाईल की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मालिकेचा निकाल देखील अद्याप स्पष्ट झालेला नाही.