IPL2021 : कोलकात्याचा दिल्लीवर ३ गडी राखून रोमहर्षक विजय
क्रीडा

IPL2021 : कोलकात्याचा दिल्लीवर ३ गडी राखून रोमहर्षक विजय

शारजा : कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकलेल्या कोलकाताने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिल्लीने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. पृथ्वीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि कप्तान ऋषभ पंतने प्रत्येकी ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले सात फलंदाज गमावले पण नितीश राणाच्या नाबाद ३६ आणि सुनील नरिनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर त्यांनी हा विजय आपल्या नावावर केला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत १० गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीच्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. वेंकटेश अय्यर (१४) ललित यादवच्या फिरकीवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर फलंदाज राहुल त्रिपाठी आवेश खानचा बळी ठरला. ११ व्या षटकात एकही धाव न देता रबाडाने शुभमन गिलला बाद केले. त्यानंतर अश्विनने मॉर्गनला शून्यावर बाद केले. त्यानंतर १४ षटकानंतर कोलकाताची धावसंख्या ९६ धावा ४ बाद अशी झाली. १६ व्या षटकानंतर कोलकाताची धावसंख्या ५ बाद ११९ अशी झाली. विजयासाठी कोलकाताला २४ चेंडूत ९ धावांची गरज असताना सुनील नरिन २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर नितेश राणाला साथ देण्यासाठी आलेला साऊदी ३ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर नितेश राणाने जिंकण्यासाठी २ धावांची गरज असतांना चौकार लगावत ३ गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला.

पृथ्वी नसल्यामुळे शिखर धवनसोबत स्टीव्ह स्मिथने सलामी दिली. धवनने स्मिथसोबत ३५ धावांची सलामी दिली. श्रेयस अय्यर सुनील नरिनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. १३व्या षटकात स्मिथला फर्ग्युसनने माघारी धाडले. स्मिथने ३९ धावा केल्या. १४ व्या षटकात शिमरॉन हेटमायरला बाद करून त्याने आयपीएलची पहिली विकेट मिळवली. हेटमायरला अय्यरने टिम साऊदीच्या चेंडूवर झेलबाद केले. ललित यादवला बाद करत सुनील नरेनने केकेआरला पाचवे यश मिळवून दिले. त्यानंतर अय्यरने पुन्हा गोलंदाजीला येत अक्षर पटेलला शून्यावर माघारी धाडले. १७व्या षटकात पंत-अश्विनने संघाचे शतक फलकावर लावले. शेवटच्या षटकात साऊदीच्या गोलंदाजीवर हे दोघे माघारी परतले. ऋषभ पंतने ३९ धावा केल्या. लॉकी फर्ग्युसन, वेंकटेश अय्यर आणि सुनील नरिन यांनी केकेआरसाठी प्रत्येकी २ बळी घेतले.