आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय
क्रीडा

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

मुंबई : इंडियन प्रिमीयर लिगचा रणसंग्राम चालू झाला आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या संघावर शेवटच्या चेंडूवर दोन गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुरुवातीला झटपट फलंदाजी केल्यानंतर मु्ंबईचे फलंदाज शेवटच्या षटकात धावा जमवण्यात अपयशी ठरले. मुंबईने 20 षटकात 9 गडी गमावत 159 धावा केल्या. बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने 27 धावांत 5 बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात बंगळुरूने 2 गडी राखून विजय नोंदवला. मुंबईच्या 160 धावांचा पाठलाग करताना पाचव्या षटकात कृणालने वॉशिंग्टन सुंदर बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. सुंदरने 10 धावा केल्या. बोल्टने पदार्पणवीर रजत पाटीदारला बाद करत बंगळुरूला दुसरा धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी भागीदारी रचली. जसप्रीत बुमराहने विराटला बाद करत ही भागीदारी तोडली. विराटने 4 चौकारांसह 33 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर मॅक्सवेलही बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. याच षटकात जानसेनने शाहबाझ अहमदला बाद केले त्यानंतर मैदानात आलेला डॅन ख्रिश्चनही काही खास कामगिरी करू शकला नाही. बुमराहने त्याला स्वस्तात बाद केले. मात्र, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने एकट्याने मोर्चा सांभाळत बुमराह, बोल्टवर आक्रमण केले आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. दोन धावांची गरज असताना ए बी डिव्हिलिअर्स बाद झाला. मात्र शेवटच्या चेंडूनवर हर्षल पटेलने विजय फटका मारत आरसीबीला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि ख्रिस लीन या फलंदाजांची जोडी सलामीसाठी मैदानात आली. पहिल्या दोन षटकात बंगळुरूच्या गोलंदाजांनी रोहित-लिनला हात खोलू दिले नाही. मात्र, तिसऱ्या षटकात रोहितने सिराजला यंदाच्या हंगामातील पहिला चौकार खेचला. रोहित मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना तो धावबाद झाला. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना रोहित वैयक्तिक 19 धावांवर माघारी परतला. रोहितनंतर आलेल्या सूर्यकुमारने लिनला हाताशी घेत संघासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. बंगळुरूचा गोलंदाज काईल जेमीसनने सूर्यकुमारला 31 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा झटका दिला. सूर्यकुमारनंतर लिनही तंबूत परतला. लिनने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावा केल्या. बंगळुरूने स्थिरावलेल्या सूर्यकुमार-लिनला बाद केल्यानंतर हार्दिक पंड्या आणि ईशान किशनची जोडी मैदानात आली. मात्र, वेगवान गोलंदाज हर्शल पटेलने हार्दिकला पायचित पकडत मुंबईला चौथा धक्का दिला. त्यानंतर हर्षलने किशनला वैयक्तिक 28 धावांवर माघारी धाडत आपला दुसरा बळी घेतला. त्यानंतर आरसीबीने मुंबईच्या फलंदाजांना जास्त फटकेबाजी करू दिली नाही. हर्षलने शेवटच्या षटकात कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डला लागोपाठ चेंडूवर बाद केले. याच षटकात हर्षलने जानसेनला यॉर्कर टाकत आपले 5 बळी पूर्ण केले. बंगळुरूकडून हर्षलने टाकलेल्या या शेवटच्या षटकात मुंबईला एकच धाव मिळाली. म्हणून मुंबईला ९ बाद १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली.