कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई
इतर

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई

गुलबर्गा : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादानंतर कर्नाटकात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथे महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसच्या काचेवर काळी शाई लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई लावली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात घेणारच, अशी घोषणा केल्यानंतर कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी, कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच, असे पोस्टर कर्नाटकच्या बसवर लावल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद कर्नाटकात उमटताना दिसत आहेत.

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेऊन आंदोलन छेडले. गुलबर्गा इथे गुलबर्गा-सोलापूर ही महाराष्ट्राची बस थांबवून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केवळ घोषणाबाजीवर ते थांबले नाही तर त्यांनी चक्क काचांवर काळी शाई लावली.

दरम्यान, ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचं बुधवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित झाला पाहिजे असं म्हणाले. “एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केलं आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कर्नाटक बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असं आपण कोर्टात सांगितलं पाहिजे,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तर त्यापूर्वी म्हणजेच 16 जानेवारी रोजी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला होता. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हंटल होत.
त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी उत्तर दिलं होतं. “कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही. उद्धव ठाकरे केवळ राजकारणासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं. यामुळे सध्याचं सौहार्दाचं वातावरण बिघडू शकतं,” असं येडियुरप्पा म्हणाले होते.

तर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी उत्तर दिलं. “कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे. या भागातील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं.” असही त्यांनी म्हंटल होतं.