राहुल गांधींना लवकर लग्न करायला सांगा; नंतर बायको मिळणार नाही! तरुणाचा थेट थोरातांना फोन
वायरल झालं जी

राहुल गांधींना लवकर लग्न करायला सांगा; नंतर बायको मिळणार नाही! तरुणाचा थेट थोरातांना फोन

मुंबई: सध्या देशभरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा आहे. दक्षिणेत भारत जोडो यात्रेला सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सगळ्यांच्याच तोंडी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना औरंगाबादमधील एका व्यक्तीला मात्र राहुल गांधी यांच्या लग्नाची चिंता सतावत आहे. रमेश पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे. रमेश पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना फोन करुन राहुल गांधी यांच्या लग्नाविषयीची चिंता बोलून दाखवली. बाळासाहेब थोरात आणि रमेश पाटील यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रमेश पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना फोन केला तेव्हा सुरुवातीला आपल्याला राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) हा उपक्रम आवडल्याचे सांगितले. सामान्य लोकांना भारत जोडो यात्रा आवडत आहे. त्यानंतर रमेश पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यापाशी राहुल गांधी यांच्या लग्नाचा मुद्दा छेडला. माझा विषय आहे की, राहुल गांधी साहेबांचे लग्न झाले पाहिजे. भारत जोडो ऐवेजी त्यांनी पहिले घर जोडो अभियान हाती घेतले पाहिजे. हे वाक्य ऐकून बाळासाहेब थोरात यांनाही हसायला आले.

यानंतरही रमेश पाटील हे राहुल गांधी यांनी लग्न का केले पाहिजे, हे बाळासाहेब थोरात यांना पटवून देत होते. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाची बायको करावी, पण आता त्यांनी लग्न करावे. त्यांनाही बायकोचा अनुभव आला पाहिजे ना, बायको कशी असते त्यांनाही समजलं पाहिजे. तसेच मीदेखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बेरोजगार असल्याचे पाटील यांनी म्हटले. माझे आईवडील मला सांभाळतात. राहुल गांधी बेरोजगार आहेत, तसा मीपण बेरोजगार आहे. मला पक्षाशी काहीही देणंघेणं नाही. पण किमान यावर्षी तरी राहुल गांधी यांचं लग्न होईल का, असा सवाल पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारला. राहुल गांधी आता ५० वर्षांचे आहेत. नंतर त्यांना बायकोही मिळणार नाही, असे पाटील यांनी थोरातांना सांगितले. बाळासाहेब थोरात आणि औरंगाबादमधील या व्यक्तीची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राहुल गांधींचा आईसोबतचा फोटो व्हायरल

राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरु केलेली भारत जोडो यात्रा तामिळनाडू, केरळ ही दोन राज्य पार करुन कर्नाटकमध्ये पोहोचली आहे. सोनिया गांधी आज भारत जोडो यात्रेत जक्कनहळी येथील पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दररोज २५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करते. सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आणि काही अंतर त्या पदयात्रेत चालत होत्या. यावळी सोनिया गांधी यांच्या पायातील बुटाची लेस सुटली. तेव्हा राहुल गांधी यांनी खाली बसून सोनिया यांच्या बुटाची लेस बांधून दिली. या दोघांचे हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.