भारतातील ‘या’ शहरात महिला आहेत सर्वाधिक सुरक्षित 
महिला विशेष

भारतातील ‘या’ शहरात महिला आहेत सर्वाधिक सुरक्षित 

देशात महिला हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यातल्या त्यात दिल्ली आणि उत्तरप्रदेशात तर महिला अजिबात सुरक्षित नाहीत. या ठिकाणी महिलांना सगळ्यात जास्त धोका असल्याचे वारंवार वेगवेगळ्या घटनांमधून दिसून येतं. अशातच देशभरात कोणत्या शहरात महिला सर्वाधिक सुरक्षित आहेत याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. तथापि, आतापर्यंत झालेल्या अनेक सर्वेक्षणामधून मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून महिलांच्या सुरक्षेबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबई पुणे नव्हे तर भारतातील हैदराबाद हे शहर महिलांसाठी सगळ्यात सुरक्षित असलेलं शहर असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार, तेलंगणा टुडेने शहरातील विविध स्त्रियांना सुरक्षित फिरताना सुरक्षित वाटते की नाही हे पाहण्याचे सर्वेक्षण केले.  या सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की, हैदराबाद हे भारतातील स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे.

तेलंगणा सरकारने महिलांच्या सुरक्षितेसाठी एसएचई टीम, भरोसा सेंटर, डायल 100, मोबाईल अ‍ॅप्स मधील एसओएस बटणे इत्यादी विविध उपक्रम सुरू केले आहेत. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या सर्व प्रभावी उपायांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.  यामुळे महिलांना हैदराबादमध्ये अत्यंत सुरक्षित वाटते. या शहरात त्या रात्री उशिरा प्रवास करू शकतील. ऑटो, कॅब बुक करु शकतील आणि अनोळखी लोकांमध्ये वावरतानाही भीती न बाळगता त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचू शकतात.

शबनम नावाच्या एका महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ” हैदराबाद काम करण्यासाठी आणि राहण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण बनविल्याबद्दल मी राज्य सरकार आणि पोलिसांचे आभार मानते. मी रात्रीच्या वेळीसुद्धा शहराच्या कुठल्याही भागात जाऊन प्रवास करू शकते आणि प्रत्येक स्त्रीला ज्या सुरक्षा सुविधा मिळायला हव्यात या सुविधा या शहराकडून पुरवल्या जात आहेत.”

शबनम पुढे  म्हणाल्या की, ”हैदराबाद ही महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे, याचा मला आनंद आहे. परंतु उर्वरित देशाची मला चिंता वाटते. सर्व राज्यांनी महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कठोर उपक्रम राबवायला हवेत. महिलांच्या समस्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. हैदराबाद हे बहुतेक शहरांपेक्षा सुरक्षित मानले जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे पोलिस दल अधिक सुलभ आहे आणि जेव्हा एखादी महिला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा छळ केल्याबद्दल तक्रार नोंदवते तेव्हा लगेच प्रतिसाद दिला जातो.”