तिघा सख्ख्या भावंडांना ट्रकने चिरडलं, औरंगाबादेत भीषण अपघात, कुटुंबावर आभाळ कोसळलं
बातमी मराठवाडा

तिघा सख्ख्या भावंडांना ट्रकने चिरडलं, औरंगाबादेत भीषण अपघात, कुटुंबावर आभाळ कोसळलं

औरंगाबाद : लहान बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी जात असतानाच भावंडांवर काळाने घाला घातला. दुचाकीवर जात असलेल्या तिघा जणांना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडले. यामध्ये तिघा सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या १८ ते २२ वर्ष वयोगटातील तीन लेकरं एकाएकी गेल्याने कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एमआयडीसी वाळूज भागातील एनआरबी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकीवरील एक भाऊ व दोन बहिणी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनिता कचरु लोखंडे (वय २२ वर्ष), निकिता कचरु लोखंडे (वय १८ वर्ष) आणि दीपक कचरु लोखंडे (वय २० रा. आसाराम बापू नगर रांजणगाव शेणपुंजी ) अशी तिघांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

दुचाकीवर जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने तिघांना चिरडले. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी वाळूज औद्योगिक नगरीतील एन. आर. बी. चौकात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दीपकच्या दोन्ही बहिणी कंपनीत कामाला होत्या. नेहमीप्रमाणे तो आज सकाळी दोघींना घेऊन त्याच्या (एम एच-२१ , ए. एम. ६९९५) या क्रमांकाच्या दुचाकीवरून कंपनीत सोडायला जात होता.

दरम्यान रांजणगाव शेंनपूजी फाट्याजवळ असलेल्या एन.आर.बी. चौकालगत भरधाव वेगात येणाऱ्या (एम.एच. ०४ , एफ. जे.५२८८) या क्रमांकाच्या ट्रकने दीपकच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तिघेही गंभीररित्या जखमी झाले होते. तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर नागरिकांनी घटनस्थळी धावं घेत पोलिसांना पाचरण केले.पोलिसांनी तिघाही मृतांचे मृतदेह रुग्णालयात हलविले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून एम. आय.डी. सी. वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करित आहेत. मात्र एकाच कुटुंबातील तिघा भाऊ बहिणींचा अपघातात चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.