सातारा : साताऱ्यात जकातवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पिसाळलेला कुत्र्याने चावा घेतल्याने युवक-युवतीचा मृत्यू झाला आहे. डबेवाडी येथील रुपाली बबन माने (वय २३) आणि जकातवाडी येथील देवानंद लोंढे (वय २५) असे या घटनेतील मृतांची नावे आहेत. मात्र, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
स्थानिक ग्रामस्थांनी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले असून या कुत्र्याने आणखी ५ जणांचा चावा घेतला असल्याचे ग्रामस्थानी सांगितले आहे. सातारा शहर परिसरातील कुत्र्यांचे सातारा नगर पलिकेच्या माध्यमातून निर्बीजिकरण करण्यात आले नसल्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सदर बझार परिसरात देखील असलेल्या कत्तलखान्यामुळे येथे कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ७ ते ८ कुत्र्यांच्या टोळक्याने एका चिमुरडीला लक्ष करत तिच्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कालच कैद झाली होती.
काही वर्षांपूर्वी कल्याणी शाळेसमोर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला होता. मोकाट कुत्र्यांनी मुलाचे भर दिवसा शरीराचे लचके तोडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशाच प्रकारचे हल्ले साताऱ्यात होऊ लागल्याने कल्याणी शाळेसमोरील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.