मुंबई : राज्यातील नवीन रुग्णांची संख्या घटत असून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होत असलेल्यांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने अधिक आढळून येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र, अद्यापही कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असून त्यात कोणतीही घट होताना दिसत नाही. मागील २४ तासांत राज्यात ४० हजार २९४ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून २६ हजार १३३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ६८२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ०९५ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९२.०४ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५ लाख ५३ हजार २२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३ लाख ५२ हजार २४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.