न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन
पुणे बातमी

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुणे : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे आज (ता. १५) पुण्यात राहत्या घरी निधन झाले. एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. आज, निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी (ता. 16) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यांचे वय ९१ वर्षे होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पी. बी. सावंत बॉम्बे युनिव्हर्सिटीतून एलएलबीची डिग्री घेतली होती. सुरवातीला मुंबई उच्च न्यायालयात वकीली केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकीली केली होती. त्यानंतर 1973 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर 1989 ला ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी राहिले. ते वर्ल्ड प्रेस कौन्सिल (लंडन) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष राहिले होते. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.

2002 च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत काम केले. 2003 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते.

बिनखर्चाची निवडणूक व्हावी असं परखड मत
निवडणूक बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी कार्यकर्ते संसदेत असावेत असं पी बी सावंत यांचं मत होतं. कोट्यवधींचा खर्च केल्याखेरीज निवडणूक जिंकता येत नाही हे सध्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या खर्चाकडे गुंतवणूक म्हणूनच पाहतात. या निवडणूक पद्धतीमध्ये बदल घडून ती बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते संसदेमध्ये प्रतिनिधी असावेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.