देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; २४ तासांत गाठला ५ महिन्यांतील उच्चांकी आकडा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; २४ तासांत गाठला ५ महिन्यांतील उच्चांकी आकडा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असून मागील २४ तासांत गेल्या ५ महिन्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात गुरुवारी २३ ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासांत एकूण २५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात सध्याच्या घडीला एकूण रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ रुग्णांवर पोहोचली असून १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार १९२ इतकी असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ६९२ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.