भारतात तयार झालेले ४ कफ सिरप कशामुळे धोकादायक? WHOनं सांगितलं नेमकं कारण
देश बातमी

भारतात तयार झालेले ४ कफ सिरप कशामुळे धोकादायक? WHOनं सांगितलं नेमकं कारण

मुंबई: पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. कफ सिरप प्यायल्यानं या मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात तयार झालेल्या चार कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. भारतीय कंपनीनं तयार केलेल्या चार कफ सिरपचा वापर तातडीनं थांबवण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खोकल्यावरील चार कफ सिरपचा वापर थांबवा, असा अलर्ट जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केला आहे. प्रोमेथाजिन ओरल सोल्युशन (Promethazine Oral Solution), कोफेक्समालिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup), मकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup) आणि मॅग्रीप एन कोल्ड सिरप (Magrip N Cold Syrup) या चार कफ सिरपचा वापर थांबवण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आल्या आहेत. या चारही सिरपची निर्मिती हरियाणास्थित मेडन फार्मास्युटिकल्स कंपनीकडून करण्यात येते.

मेडन फार्म्यास्युटिकल्सनं तयार केलेल्या ४ कफ सिरपमध्ये डायथायलिन ग्लाइकॉल (diethylene glycol) आणि एथिलीन ग्लायकॉल (ethylene glycol) यांचं प्रमाण अधिक आढळून आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात चारही कफ सिरप केवळ गाम्बियातच आढळून आली आहे. मात्र हे सिरप इतर देशांच्या बाजारांमध्येही उपलब्ध असू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर तातडीनं रोखण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत.

मेडन फार्म्यास्युटिकल्स कंपनी हरयाणाची आहे. तिनं कॉर्पोरेट कार्यालय दिल्लीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केल्यानंतर कंपनीची चौकशी सुरू झाली आहे. कंपनीनं तयार केलेल्या सिरपचा वापर केल्यानं गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचं वय ५ वर्षांपेक्षा कमी होतं. कफ सिरप घेतल्यानंतरच्या ३ ते ५ दिवसांत ही मुलं आजारी पडली. त्यानंतर त्यांना मृत्यूनं गाठलं.

गाम्बियातील मुलांच्या मृत्यूची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं २९ सप्टेंबरला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला दिली होती. मेडन कंपनीच्या ४ सिरपमध्ये डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त असल्याचं तपासणीत आढळून आलं. या दोन्ही घटकांचं अधिक प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण त्यामुळे अनेक साईड इफेक्ट्स होतात. डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलच्या अधिकच्या मात्रेमुळे किडनीची समस्या, पोटदुखी, उल्टी, अतिसार, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.