आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी
देश बातमी

आता देशाला दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली : गडकरी

नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबद्दल देशातील सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असताना आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी त्यावर भूमिका मांडली आहे. देशाला आता दुसऱ्या पर्यायाची गरज आहे, असं गडकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या महिन्याभरात किमान १० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या ८ दिवसांमध्ये तर रोज या किंमती वाढतच आहेत. दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये लिटर तर मुंबईत हाच दर ९५.७५ रुपये लिटरपर्यंत पोहोचला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत पेट्रोलचे दर २ रुपये ९९ पैशांनी वाढले आहेत. तर मुंबईत पेट्रोल तब्बल ३ रुपये २२ पैशांनी महाग झाले आहे. त्यामुळे यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून पत्रकारांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. माझा सल्ला आहे की आता देशाला दुसऱ्या पर्यायाकडे जाण्याची वेळ आली आहे. मी आधीपासूनच विजेचा इंधन म्हणून वापर करण्याचा प्रसार करत आहे. कारण भारतात अतिरिक्त विजेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे, असं ते म्हणाले. तसेच, आपण भारतात ८१ टक्के लिथियम बॅटरी बनवत आहोत. माझ्या मंत्रालयाने आज लिथियम आयनला पर्याय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारशी संबंधित सर्व प्रयोगशाळा यावर संशोधन करत आहेत. इंधनासाठी मंत्रालय हायड्रोजेन सेल्सच्या पर्यायाची देखील चाचपणी करत आहे, असं देखील गडकरींनी यावेळी सांगितलं.