PM Narendra Modi: ‘ईडीने तुम्हाला एकत्र आणलं,’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विरोधकांवर टीकेचा हल्लाबोल
राजकारण

PM Narendra Modi: ‘ईडीने तुम्हाला एकत्र आणलं,’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विरोधकांवर टीकेचा हल्लाबोल

PM Narendra Modi: राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. काल राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केलेल्या आरोपांवरही पंतप्रधानांनी पलटवार केला आहे. ‘ईडीमुळे विरोधक एकत्र आले, निवडणूक हरल्यानंतर एकत्र आले नाहीत. मतदारांना जे जमलं नाही ते ईडीमुळे शक्य झालं’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘तर काही जणांनी काल हावर्ड विद्यापीठाचा दाखला दिला. पण हावर्ड विद्यापीठात भारतीय काँग्रेसचा ऱ्हास यावर अभ्यास झालेला आहे. भविष्यात मोठ्या विद्यापीठातही असाच अभ्यास होईल, ज्याने काँग्रेस डुबवली त्याच्यावरही अभ्यास होईल’, अशी टीका पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर केली.

‘निवडणूक हरले तर ईव्हीएमला शिव्या देतात. आणि निवडणूक आयोगाला शिव्या देतात. निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर सुप्रीम कोर्टाला शिव्या देतात. विरोधक निराशेमध्ये आहेत. मोदींना शिव्या द्या, मोदींवर खोटे आरोप करा तरच मार्ग निघेल, असं काहींना वाटतंय. मागच्या 22 वर्षात ते याच गैरसमजामध्ये आहेत. देशाच्या लोकांसाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोदीने प्रत्येक क्षण खर्ची घातला आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘ पूर्ण देशाचा मोदीवर विश्वास आहे, हे यांना समजण्याच्या पलीकडे आहे. तब्ब्ल 80 कोटी लोकांना फुकट धान्य मिळालं, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, ते तुमच्या खोट्या आरोपांवर कसा विश्वास ठेवेल? काही जण स्वत:च्या कुटुंबासाठी जगत आहेत, मी 25 कोटी कुटुंबाच्या घरातला सदस्य आहे. 140 कोटी जनतेचे आशिर्वाद माझ्यासाठी सुरक्षा कवच, मला शिव्या देऊन हे सुरक्षा कवच तुम्ही भेदू शकत नाही’, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.