हल्लाबोल करणार, आसूड ओढणार, गौप्यस्फोट होणार, राऊत-ठाकरेंच्या मुलाखतीची तारीख ठरली
राजकारण

हल्लाबोल करणार, आसूड ओढणार, गौप्यस्फोट होणार, राऊत-ठाकरेंच्या मुलाखतीची तारीख ठरली

मुंबई : शिवसेनेतलं आजवरचं सगळ्यात मोठं बंड एकनाथ शिंदे रुपाने अवघ्या देशाने बघितलं. ‘ठाकरे परिवार’ संकटात असताना मातोश्रीच्या निष्ठावंतांनी, ज्यांना आजपर्यंत शिवसेनेने होतं तेवढं सगळं दिलं, त्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झालेली असताना आणि ते कोरोनाशी झुंजत असतानाच एकनाथ शिंदेनी आपल्या साथीदारांसह बंड केलं. या संपूर्ण काळात शिवसेनेसारखी जहाल संघटना आपल्या हाती असताना ठाकरे परिवाराने संयमाने ही सगळी परिस्थिती हाताळली. गेले ४ आठवडे बंडखोर आमदार ठाकरेंवर आरोप करतायेत, आम्ही हा निर्णय का घेतला, याची कारणं देतायत. त्यांच्या आरोपांवर आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देतायत, गद्दारीचं कारण विचारतायत, राजीनामे देण्याचं चॅलेंज देतायत. मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे अजूनही शांत होते. आता उद्धव ठाकरेंची वात सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊतांनी पेटवली आहे. येत्या २७ आणि २७ जुलै रोजी सामनासाठी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन मुलाखतीसंदर्भात माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रोखठोक प्रश्न, सडेतोड उत्तरं, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची पहिली मुलाखत

बंडखोरांना उत्तर देण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला मुंबई आणि उपनगरांत जोरदार प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला हजारो नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. ठाकरे कुटुंबाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून उद्धव ठाकरे देखील आता मैदानात उतरले आहेत. लवकरच ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी ‘सामना’ला कडक-धडक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून ते बंडखोरांवर सडकून प्रहार करतील, बंडखोरांच्या एका एका टीकेला जोरदार प्रत्युत्तर देतील. बंडखोरांच्या बंडाचं खरं कारण काय, त्यांना नेमकी कुठली गोष्ट खुपली, ज्यामुळे त्यांनी ठाकरेंविरोधात बंड केलं, अशा महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील, तर संजय राऊत त्यांच्या नेहमीच्या रोखठोक स्टाईलने ठाकरेंना बोलतं करण्याचा, त्यांना खुलविण्याचा प्रयत्न करतील.

गद्दारांनी केला पाठीवर वार, मग आता वाचाच शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’चा टणत्कार!

बंडखोर दरदिवशी नवे आरोप करतायेत, बंडखोरीची नवनवीन कारणं देतायत, ठाकरे कुटंबाचं काय चुकलं, हे जाहीर सभांमधून पच्रकार परिषदांमधून सांगण्याचा प्रयत्न करतायत. इकडे ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे त्यांना प्रत्युत्तर देतायत. पण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बंडखोरांवर जाहीरपणे भाष्य करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुलाखत देत आहेत. या मुलाखतीची अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. राऊत-ठाकरेंची मुलाखत शूट झाली आहे. येत्या २७ जुलै रोजी सामनातून ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहेत.