अक्षरचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
क्रीडा

अक्षरचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

अहमदाबाद : तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर तर भारताचा पहिला डाव १४५ धावांत संपुष्टात आला. अक्षर पटेलने दुसऱ्या डावात पाच बळी टिपले आणि सामन्यात १० गडी बाद करत पराक्रम केला. अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३८ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. एका सामन्यात सर्वात कमी धावा देऊन १० गडी टिपण्याचा विक्रम त्याने केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अक्षर पटेलची ही कामगिरी दिवस-रात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. हा विक्रम आता अक्षरच्या नावावर आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने एका सामन्यात सर्वाधिक १० बळी टिपले होते. तर वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूने भारताविरूद्ध दीडशेहून अधिक धावा देत १० बळींचा टप्पा गाठला होता. अश्विनने मात्र ७० धावा देत ११ गडी बाद केले होते.

दरम्यान, पहिल्या डावाअखेरीस १३ धावांनी पिछाडीवर असलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या ८१ धावांवर गारद झाला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून आले. जॅक क्रॉली (०), जॉनी बेअरस्टो (०), डॉम सिबली (७), जो रूट (१९), बेन स्टोक्स (२५), ओली पोप (१२) आणि बेन फोक्स (८) हे सात महत्त्वाचे फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाले. त्यानंतर जोफ्रा आर्चर (०), जॅक लीच (९) आणि जेम्स अँडरसन (०) हे तळाचे फलंदाज लगेच माघारी परतले. अक्षरने ५, अश्विनने ४ तर वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला.