भाजप नेता म्हणतो; हनुमा विहारीनं क्रिकेटची केली हत्या
क्रीडा

भाजप नेता म्हणतो; हनुमा विहारीनं क्रिकेटची केली हत्या

नवी दिल्ली : बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं. हनुमा विहारी आणि आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली. हनुमा विहारीच्या या कामगिरीचे क्रिकेटच्या जाणकारांडून एकाबाजूला कौतुक होत आहे. पण गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र विहारीच्या खेळावर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. क्रिकेटमधलं मला काही कळत नाही असं सुद्धा बाबुल सुप्रियो यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. हनुमा विहारीने पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर भारताने कदाचित ऐतिहासिक विजयाची नोंद केली असती असे बाबुल सुप्रियो म्हणाले. कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडू सीमापार मारायला पाहिजे होते, असे बाबुल सुप्रियो म्हणाले.

दरम्यान, ऋषभ पंत ९७ धावांवर बाद झाल्यानंतर हनुमा विहारीने संयमाने फलंदाजी केली व सामना अनिर्णीतावस्थेकडे नेला. खरंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयाची जास्त संधी होती. परंतु काही काळासाठी भारतालाही विजयाची संधी असल्याचे दिसत होते. परंतु हनुमा विहारी आणि जाडेजा दुखापतग्रस्त असल्याने ते शक्य नव्हते हे ओळखून विहारी आणि अश्विन यांनी फलंदाजी केली.