मोठी बातमी ! राज्य पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी होणार भरती
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! राज्य पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी होणार भरती

नागपूर : राज्यातील पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. यात पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी भरती होणार आहे. पुढे उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, १२,५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. तसेच, जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर, 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे. अनिल देशमुखांच्या आजच्या घोषणेनंतर पोलीस भरती प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचं निश्चित झालं असलं तरी मराठा संघटना याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.