आशिया चषकासाठी भारताचा संघ जाहीर, उपकर्णधार संघाबाहेर, विराट कोहलीचे पुनरागमन
क्रीडा

आशिया चषकासाठी भारताचा संघ जाहीर, उपकर्णधार संघाबाहेर, विराट कोहलीचे पुनरागमन

मुंबई : युएइमध्ये होणाऱ्या Asia Cup 2022साठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम असले तरी उपकर्णधार मात्र संघात नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताचे उपकर्णधारपद यापूर्वी जसप्रीत बुमराने भूषवले होते. पण दुखापतीमुळे बुमरा या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो संघाबाहेर असेल. पण बुमरा नसताना संघाचे उपकर्णधारपद हे पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, दीपक चहल आणि अक्षर पटेल यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

आशिया चषक स्पर्धेची ही १५ वी आवृत्ती यूएईमध्ये सहा संघांमध्ये (मुख्य स्पर्धा) खेळली जाईल. गतविजेता भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने सात वेळा ट्रॉफी जिंकली आहे. स्पर्धेची शेवटची आवृत्ती एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आली होती, तर या आवृत्तीत ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सहा संघ दोन गटात विभागले गेले आहेत. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान आणि पात्रता पूर्ण करणारा एक संघ ‘अ’ गटात आहेत आणि श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या गटात ब गटात समावेश आहे. प्रत्येक संघ गट टप्प्यात एकदा दुसऱ्या संघाशी खेळणार आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढे जातील. त्यानंतर दोन संघांमध्ये सुपर-४चे सामने होतील आणि त्यामधून अंतिम फेरीचे दोन संघ निवडले जातील. ही स्पर्धा यापूर्वी श्रीलंकेत होणार होती. पण श्रीलंकेतील अस्थिरता पाहता ही स्पर्धा युएइमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा , आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान