लोकसभेच्या ४० जागांवर भाजपाला बसणार शेतकरी आंदोलनाचा फटका
देश बातमी

लोकसभेच्या ४० जागांवर भाजपाला बसणार शेतकरी आंदोलनाचा फटका

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, त्याचे तीव्र पडसाद निवडणुकांमध्ये उटण्याची भीती बोलून दाखवली जात आहे. विशेषतः पंजाब, हरयाणासह पश्चिम उत्तर प्रदेशात या पट्ट्यात शेतकरी आंदोलन पसरु लागल्यामुळे भाजप नेत्यांची चिंता वाढली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंगळवारी हरयाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील पक्ष नेत्यांसोबत चर्चा करुन त्यांच्याकडून परिस्थिती समजून घेतली. साखर पट्टयात आंदोलक शेतकऱ्यांच्या महापंचायती होत असताना, पक्ष प्रमुख जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, खासदार आणि जिल्ह्या नेत्यांबरोबर चर्चा केली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बलियान सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तोमर आणि बलियान दोघे जाट समाजातून येतात.

हे आंदोलन आणखी पसरणार नाही, याची भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांना खाप नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. कृषी कायद्यावरुन लोकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणामधील भाजपा पदाधिकाऱ्यांना रणनिती बनवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.