जीडीपीत ७.३ टक्क्यांची घसरण; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धक्का
देश बातमी

जीडीपीत ७.३ टक्क्यांची घसरण; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धक्का

नवी दिल्ली : कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार जीडीपीत ७.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे. चार दशकातील सर्वात मोठी घट असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यापूर्वी १९७९-८०मध्ये ग्रोथ रेट -५.३ टक्के नोंदवला गेला होता. तेव्हा देशात दुष्काळजन्य स्थिती होती. तसेच कच्च्या तेलाचे भावही दुप्पट झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आर्थिक वर्ष २०१९-२० या कालावधीत जीडीपी ४ टक्के होता. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात ८ टक्के जीडीपी घसरेल असा अंदाज बांधला होता. मात्र २०२०-२१ या वर्षात जीडीपी ७.३ टक्क्यांनी घट नोंदवली गेली. चौथ्या तिमाहीत ग्रोथ रेट १.६ टक्के नोंदवला गेला. मागच्या वर्षी मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट आली होती. तेव्हा अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं होतं. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन तिमाहीत भारताचा जीडीपी निगेव्हटी ग्रोथ दाखवत होता. मात्र चौथ्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्क्यांनी वाढला आहे.

जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध केली जाते. जीडीपीसाठी देशातील उत्पादन आणि सेवांचा विचार केला जातो. कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रात उत्पादन घटलं किंवा वाढलं यावर सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीवर देशाच्या आर्थिक विकासाची गणितं बांधली जातात. मात्र, लॉकडाउन आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे त्याचा प्रभाव या क्षेत्रांवर पडला आहे. दुसरीकडे, चीनमध्ये जानेवारी-मार्च २०२१ या तिमाहीत १८.३ टक्क्यांनी जीडीपी वाढला आहे.