नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
देश बातमी

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

नवी दिल्ली : “भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आतापर्यंत गुलागिरीचं निशाण होतं. पण आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारं काम आपण केलंय. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झेंड्यावरुन पुसून टाकलंय. आजपासून भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. तो झेंडा आपण नौदलाचे प्रणेते छत्रपती शिवरायांना समर्पित करतो आहोत”, अशी मोठी घोषणा करतानाच नौदलाचा नवा झेंडा आता समुद्रात आणि आकाशात डौलाने फडकेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशाची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. केरळमधील कोची येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात आयएनएस विक्रांत युद्धनौकेचं महत्त्व पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज भारत जगातील त्या देशांमध्ये सामील झाला आहे, जे देश स्वदेशी तंत्रज्ञानाने एवढी मोठी विमानवाहू युद्धनौका तयार करतात. आज आयएनएस विक्रांतने देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे. आयएनएस विक्रांतच्या प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य आहेत, एक ताकद आहे, स्वतःचा विकास प्रवास आहे. आयएनएस विक्रांत म्हणजे स्वदेशी क्षमता, स्वदेशी संसाधने आणि स्वदेशी कौशल्यांचे प्रतीक आहे. त्याच्या एअरबेसमध्ये बसवलेले स्टीलही स्वदेशी आहे.

विक्रांत विशाल-विराट- विहंगम

“विक्रांत विशाल आहे, विराट आहे, विहंगम आहे.. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत खासही आहे. विक्रांत ही केवळ युद्धनौका नाही. २१ व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा हा पुरावा आहे”

नौदलाचा नवा ध्वज शिवरायांना समर्पित

छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदलातील योगदान अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नौदल उभारलं, ज्याने शत्रूंची झोप उडवली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणाऱ्या व्यापाराच्या ताकदीचा धाक होता. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आता छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आजपासून नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात फडकणार आहे. भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आतापर्यंत गुलागिरीचं निशाण होतं. पण आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारं काम आपण केलंय. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झेंड्यावरुन पुसून टाकलंय. आजपासून भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे”.

सेंट जॉर्जेस क्रॉस हटवलं, आता झेंड्यावर तिरंगा आणि बोधचिन्ह

आधीच्या ध्वजावर पूर्वीच्या दोन लाल रेषा होत्या.त्या लाल रेषा आता काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यांना सेंट जॉर्जेस क्रॉस म्हटलं जायचं. ज्या ब्रिटिशांच्या राजवटीपासून तशाच राहिल्याचं सांगितलं जातं. आता मात्र नव्या झेंड्यावर एका बाजूला भारताचा तिरंगा दिसणार आहे, तर त्याच्या बाजूला नौदलाचं बोधचिन्ह दिसणार आहे.