भाजपला बगल देत भिडे म्हणतात शिवसेनाच हवी
पश्चिम महाराष्ट्र बातमी

भाजपला बगल देत भिडे म्हणतात शिवसेनाच हवी

मुंबई : या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच हवी असे मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. त्यामुळे भाजपने भिडेंना बगल दिली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. एका चौकाच्या नामकरण कार्यक्रमात त्यांनी देशाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज आनंदाची गोष्ट होत आहे. फार विलंब झालेली चांगली गोष्ट आज होते आहे. हे नामकरण २५ वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं, ते आज होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची आशा आकांक्षा होती की, संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. चौकाचं नामकरण होईल, पण कामाचं काय? या सांगली गावात शिवसेनेच्या २००-२५० शाखा का नाहीत? हे दुःख आपण कार्यान्वित करुया, असं संभाजी भिडे म्हणाले.

संभाजी भिडे म्हणाले, या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तसंच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल. भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे. हे लक्षात घेऊन आपण कामावर तुटून पडूया. एका चौकाचं नाव काय पण संपूर्ण देशाचं नाव या नावानं ओळखला गेलं पाहिजे. इतकी महत्त्वाची आहे शिवसेना, असंही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.