रोजगार निर्मितीसाठी दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण करण्याचे राज्यसरकारचे आदेश
बातमी महाराष्ट्र

रोजगार निर्मितीसाठी दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण करण्याचे राज्यसरकारचे आदेश

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दाजीपूर अभयारण्य विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक वर्षा निवासस्थानी झाली. दाजीपूर अभयारण्यात पर्यटन वृद्धीसाठी कोणत्या बाबी प्राधान्याने करणे आवश्यक आहे याबाबत माहिती जाणून घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, येथील ऐतिहासिक हत्तीमहालाची दुरुस्ती करणे आणि हत्तीसफारी सुरू करणे, राधानगरी येथे नौकाविहाराची व्यवस्था निर्माण करणे तसेच राऊतवाडी धबधबा येथे पर्यटक सुविधा निर्माण करणे याबाबी प्राधान्याने निर्माण कराव्या. तत्पूर्वी तेथे येण्यासाठी चांगले रस्ते आणि निवासव्यवस्था असणे आवश्यक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून तेथील रिसॉर्टची दुरुस्ती आणि अद्ययावतीकरण करण्यात यावे, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.

अभयारण्यात फेरीसाठी अंतर्गत रस्ते वन्यजीवांना त्रासदायक ठरणार नाही अशा पद्धतीने विकसित करावेत. पर्यटकांसाठी वनदर्शनासाठी इलेक्ट्रिक बस घेण्यात यावी तसेच स्थानिक युवकांना गाईडचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा. हे करत असताना स्थानिकांना रोजगार मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. दाजीपूर अभयारण्यात एमटीडीसीच्या माध्यमातून सध्याचे पर्यटक निवास (रिसॉर्ट) अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे तसेच पर्यवरणपूरक पद्धतीने तेथील सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.