‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचे निधन
राजकारण

‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचे निधन

‘परळ ब्रँड’ आणि कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. मोहन रावले यांच्यावर आज रात्री किंवा उद्या सकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. आज रात्री मोहन रावले यांचे पार्थिव गोव्याहून मुंबईत आणलं जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोण आहेत मोहन रावले
लालबाग-परळमधील लोकप्रिय नेते असणाऱ्या मोहन रावले यांची लालबाग-परळ ब्रँड अशी ओळख होती. लालबाग परळमध्ये वाढलेले मोहन रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

मोहन रावले यांना क्रिकेटची फार आवड होती. यामुळे ते क्रिकेटमध्ये करिअर करु असणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे. ते क्रिकेटचे सामनेही भरवत असतं. लालबाग-परळमध्ये पक्षवाढीचं कामही त्यांनी केलं असून या भागांत शिवसेना रुजवण्याच्या कामात मोहन रावले यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पक्षासाठी मोलाचं योगदान देताना अनेक शिवसैनिकही घडवले. शिवसेनाचा खंदा कार्यकर्ता गेल्यामुळे शिवसेनेत शोककळा पाहायला मिळत आहे.

मोहन रावले यांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी यांनी निधनावर प्रतिक्रिया दिली. “मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट करत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तर मोहन रावले यांच्या निधनाच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, “मला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास समजलं की गोव्यात मोहन रावले यांचं निधन झालं. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्या निवडणुकीचे नामांकन फॉर्म्स असायचे ते मी माझ्या हस्ताक्षरात भरत असे. रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ अंगरक्षक होते. लालबाग परळ भागातील अतिशय लोकप्रिय माणूस अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी मनस्वी शिवसैनिक आणि मित्र गमावला.”