रोहित शर्मा आज पाकिस्तानविरुद्ध हिशेब चुकता करणार; एका क्लिकवर जाणून घ्या महालढतीचे सर्व अपडेट
क्रीडा

रोहित शर्मा आज पाकिस्तानविरुद्ध हिशेब चुकता करणार; एका क्लिकवर जाणून घ्या महालढतीचे सर्व अपडेट

दुबई: गेले कित्येक दिवस टीम इंडियाची लढत असली की, विराट कोहलीच्या हरपलेल्या फॉर्मची चर्चा होत असे. आज, रविवारीही भारताची लढत आहे; पण यावेळी विराटची चर्चा किंचीत कमी आहे. तमाम भारतीयांना आज फक्त जिंकण्याची आस आहे. त्यामुळे कुणाकडून कामगिरी व्हावी अन् विजय पदरी पडावा अशी अपेक्षा आहे; कारण गाठ पडणार आहे ती कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) अन् निमित्त आहे आशिया कप टी-२० स्पर्धेतील लढतीचे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दोन्ही देशांतील राजकीय वातावरणामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिका थांबल्याच आहेत. गेल्या दहा वर्षांत हे संघ एकमेकांविरुद्ध मालिका खेळलेले नाहीत. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये हे संघ समोरासमोर आले की क्रिकेटविश्वासह साऱ्यांचेच लक्ष या लढतीकडे लागते.

कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीचा नवा दृष्टिकोन सोबत घेऊन मैदानात उतरले, तर विराट कोहलीसारखा मुरलेला फलंदाज यशस्वी पुनरागमनाचे ध्येय उराशी बाळगून आहे. यावेळी भारताला गेल्या लढतीचे हिशेबही चुकते करायचे आहेत. साधारण दहा महिन्यांपूर्वी टी-२० वर्ल्ड कपच्या लढतीत भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा विजय मिळवत स्पर्धेचा श्रीगणेशा करत पुढील वाटचाल सोपी करण्यावर टीम इंडियाचा भर असेल. तसेच ही लढत आणि विजयी निकाल भारतीयांसाठी रविवारची सुटी सार्थकी लावेल.

रोहित, विराट हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील टीम इंडियाचे आधारस्तंभ. मात्र गेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ते निष्प्रभ ठरले होते. ती मरगळ झटकत पाकिस्तानला याच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पराभवाची धूळ चारणे रोहित आणि विराटचाही आत्मविश्वास वाढविणारे ठरेल. पाकिस्तान संघाचा गेल्या टी-२० वर्ल्ड कपपासून सकारात्मक कायापालट झाला आहे. अशा संघाशी दोन हात करताना बुद्धी, चातुर्याची भूमिकाही महत्त्वाची ठरेल.

एक बाब इथे प्रामुख्याने नमूद करावी लागेल अन् ती म्हणजे एकमेकांविरुद्ध वारंवार खेळत नसल्याने प्रतिस्पर्धी संघांना एकमेकांच्या खेळाडूंचा अंदाज नाही. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना भारतीय फलंदाज अडखळले होते. परिणामी दहा विकेटने पराभव पत्करावा लागला. आफ्रिदीने पहिल्या दोन षटकांतच भारतीय संघाची दाणादाण उडवून दिली होती. मात्र यावेळी जायबंदी झाल्याने आफ्रिदी आशिया कपला मुकला आहे.

टी-२० वर्ल्ड कपमधील अपयशानंतर संघव्यवस्थापनाने भारताच्या फलंदाजीत बरेच प्रयोग केले. मात्र क्रम जवळपास गेल्या वर्ल्ड कपप्रमाणेच आहे. रोहित, ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या पवित्र्यात चांगले बदल झाले असून सूर्यकुमार यादवसारखा मैदानात चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज टीम इंडियाला गवसला आहे. मध्यंतरी दीपक हुडाला आयर्लंडविरुद्ध डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या पुनरागमन झाले आहे. अन् पाकिस्तानसारख्या महत्त्वाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध संघव्यवस्थापन अनुभवी फलंदाजांनाच संधी देण्याची शक्यता अधिक आहे.

-अव्वल तीन फलंदाजांचे अपयश

यंदाच्या मोसमात राहुलने अद्याप एकाही आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भाग घेतलेला नाही. विराटने विंडीजसारख्या संघाच्या दुबळ्या माऱ्यापुढे एक अर्धशतक केले होते. तर रोहित शर्माला चांगल्या सुरुवातीला सत्कारणी लावणे जमलेले नाही. अशा नकारात्मक आकडेवारीला तुर्तास विसरून भारतीय संघास नव्या दृष्टीकोनासह पाकिस्तानचा सामना करायचा आहे. भारताचा उपकर्णधार लोकेश राहुलनेही तसे संकेत दिले होते. ‘गेल्या वर्ल्ड कपच्यावेळी भारतीय संघाचा जो दृष्टिकोन होता, तसा आता अजिबातच नाही. आम्ही नव्या उमेदिने रविवारी मैदानात उतरू अन् त्याच दृष्टिने पुढील वाटचाल करू’, असा विश्वास राहुलने गेल्या शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला होता.

-सूर्या, हार्दिक, पंतकडून अपेक्षा

भारताचे यश सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या कामगिरीवरही अवलंबून आहे. आघाडीचे फलंदाज दिमतीला असतीलच, पण या तिघांची कामगिरी डाव उभारणीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

-प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात

बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांच्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजीला बळकटी येते. तिसऱ्या क्रमांकावरील फखर जमा हादेखील खमका फलंदाज आहे. मात्र पाकिस्तानच्या इतर फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव आहे.

-आफ्रिदी, बुमराहची अनुपस्थिती

पाकिस्तानला जशी जायबंदी आफ्रिदीची पोकळी जाणवेल, तशीच भारताला जसप्रीत बुमराहची गैरहजेरीही एखाद्या धक्क्याप्रमाणेच आहे. पाठदुखीमुळे त्याने आशिया कपमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला. भारताचा टी-२०मधील तज्ज्ञ गोलंदाज हर्षल पटेलही बरगड्यांच्या दुखापतींमुळे संघाबाहेर आहे. अशा स्थितीत भुवनेश्वरकुमार अखेरच्या षटकांमध्ये तरुण गोलंदाज अर्शदीपसिंगला सोबत करेल.

प्रतिस्पर्धी संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.

पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाझ दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.

लक्ष्यवेधक

लढत- भारत विरुद्ध पाकिस्तान

ठिकाण- दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

वेळ- संध्याकाळी ७.३० पासून

प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्स

खेळपट्टीचे अनुमान- दुबईतील तापमान उष्ण आणि कोरडे आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल सामन्यावर मोठा परिणाम करणारा नसेल. खेळपट्टी गोलंदाज, फलंदाज यांना समान संधी देणारी असण्याची शक्यता अधिक. तरीदेखील नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीची निवड करण्याची शक्यता अधिक.

महत्त्वाचे मोहरे-

सूर्यकुमार यादव (भारत) : दडपण झुगारून खेळणे, चौफेर फटकेबाजी करणे यात भारताचा मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचा हातखंडा आहे. त्यात तो भारतीय संघाचा टी-२० तज्ज्ञ फलंदाजही आहे. गेल्या नऊ लढतींमध्ये त्याने ३५.६७ची सरासरी आणि १८७.७१च्या स्ट्राइक रेटने ३२१ धावा फटकावल्या आहेत.

यजुवेंद्र चहल : गेल्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपच्या भारतीय संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेल्या यजुवेंद्र चहलने या क्रिकेट मोसमात छाप पाडली. गेल्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थानकडून सर्वाधिक मोहरे टिपले. गेल्या १२ टी-२०चा हिशेब केल्यास चहलच्या नावावर १५ विकेट जमा असल्याचे दिसते.