आता रहाणेची कसोटी; तिसऱ्या कसोटी पहिल्या दिवसअखेर कांगारू भारी
क्रीडा

आता रहाणेची कसोटी; तिसऱ्या कसोटी पहिल्या दिवसअखेर कांगारू भारी

सिडनी : दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जीवावर भारताने बाजी मारली होती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेची कसोटी लागणार असून पहिल्या दिवसी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मार्नस लाबुशेन (६७*) आणि विल पुकोव्हस्की (६२) यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिवसअखेर लाबुशेन (६७) आणि स्मिथ (३०) नाबाद आहेत. भारतीय संघाकडून सिराज आणि सैनी यांना प्रत्येकी एक एक विकेट घेण्यात यश मिळालं. सात षटकानंतर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी ५५ षटकांचा सामना खेळवण्यात आला. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला सिराजनं पाच धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात वरचढ होणार असं वाटलं होतं. मात्र, पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीनं संयमी फलंदाजी केली. पुकोव्हस्कीला लाबुशेन यानं उत्तम साथ दिली. पुकोव्हस्की-लाबुशेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी केली. अखेर पदार्पण करणाऱ्या सैनीनं पुकोव्हस्कीला पायचीत करत ही जोडी फोडली. पुकोव्हस्कीनं ६२ धावांची खेळी केली.

पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या स्मिथनं लाबुशेनबरोबर संथ असेली धावसंख्या वाढवली. एकदिवसीय सामन्याप्रमाणे दोघांनी फटकेबाजी केली. पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर लाबुशेन यानं सामन्याची सुत्रं आपल्याकडे घेतली. लाबुशेन यानं कारकीर्दीतील नववे अर्धशतकं झळकावलं. स्मिथनं त्याला चांगली साथ दिली. स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६० धावांची नाबाद धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी मजबूत केली आहे. भारताकडून सिराज-सैनीचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आलं नाही. बुमराह, अश्विन आणि जाडेजाची पाटी दिवसाखेर कोरीच राहिली.