‘आमच्यावर भारतात हल्ला झाला…’ पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने केले धक्कादायक विधान
क्रीडा

‘आमच्यावर भारतात हल्ला झाला…’ पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने केले धक्कादायक विधान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तानचा संघ अनेक वर्षांनी भारत दौऱ्यावर येणार आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे, . दरम्यान, माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. कारण दोन्ही देशांमधील राजकीय संबंध चांगले नाहीत. मात्र भारत आणि पाकिस्तान केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. त्यामुळे अनेक वर्षांनी पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येत आहे, परंतु त्याआधी भारत आणि पाकिस्तान आशिया कप २०२३ मध्ये देखील आमनेसामने येणार आहेत. दुसरीकडे शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “आमच्यासाठी भारतात खूप तणावपूर्ण परिस्थिती होती. कारण जेव्हा कधी आम्ही चौकार किंवा षटकार मारायचो तेव्हा टाळ्या वाजायच्या नाहीत. रझाकला आठवत असेल तर, जेव्हा आम्ही बंगळुरू कसोटी जिंकलो तेव्हा आमच्या बसवरही दगडफेक करण्यात आली होती.” आफ्रिदीच्या या वादग्रस्त वक्तव्यावेळी त्याचा सहकारी अब्दुल रझाकही उपस्थित होता.

पाकिस्तान संघाने २००५ साली भारताचा दौरा केला होता आणि यादरम्यान दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ६ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात होती. त्याचवेळी पाकिस्तान संघाने कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. त्याचबरोबर एकदिवसीय मालिका पाकिस्तान संघाने ४-२ ने जिंकली. यादरम्यान आफ्रिदीने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळला. आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार, या सामन्यातून परतत असताना पाकिस्तान संघाच्या बसवर दगडफेक करण्यात आली.

नेमकं म्हणायचंय तरी काय आफ्रिदीला?

उल्लेखनीय म्हणजे एकीकडे आफ्रिदी पाकिस्तानला भारतात पाठवण्याबाबत बोलत राहतो तर दुसरीकडे वादग्रस्त विधाने करत आहे. यावर आफ्रिदी म्हणाला की, “तुम्ही सगळे म्हणत आहात की, ‘पाकिस्तानने भारतात जाऊ नये आणि वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकावा. पण मला असे वाटत नाही. माझा विश्वास आहे की आपण तिथे जावे आणि विश्वचषक जिंकून परत यावे.”