अण्णा नाईक इलो….! रात्रीस खेळ चाले मालिका पुन्हा सुरु
मनोरंजन

अण्णा नाईक इलो….! रात्रीस खेळ चाले मालिका पुन्हा सुरु

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील माई, अण्णा, सुषमा, अभिराम, छाया, दत्ता, वच्छी, पांडू, शेवंता या सर्व कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने पात्रात जिवंतपणा आणला. मालिकेतील प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं. आता पुन्हा एकदा अण्णा नाईक यांचा आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहे. आता या मालिकेचा तीसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

झी मराठी वाहिनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अण्णा नाईक परत येणार, लवकरच…! अशी घोषणा केली. सोबतच त्यांनी अण्णांचा एक मोशन पोस्टर देखील शेअर केला आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीस खेळ चाले या थ्रिलर मालिकेचा तीसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सिद्ध होतं. मालिकेच्या पहिल्या भागात अण्णा नाईक यांचा गूढ मृत्यू दाखवण्यात आला होता. त्यानंतर अनेक व्यक्तींचे खून दाखवले गेले. जणू ते अण्णा नाईक करत आहेत असा आभास निर्माण करण्यात आला. शेवटी होणारे सर्व खून हे अण्णांची मोठी सून त्यांच्या संपत्तीसाठी करते, हे उघड होते.

तर, दुसऱ्या भागात अण्णा नाईक यांच्या आयुष्याचा उलगडा झाला आहे. २० वर्षांपूर्वी त्यांनी केलेलं प्रेमप्रकरण यात दाखवण्यात आलं. त्यांनी अनेक महिलांना फसवलं होतं. त्यातील एक म्हणजे शेवंता. शेवंताच्या आणि अण्णांच्या प्रेमाची चर्चा तर घराघरात होती. शेवटी मात्र, अण्णा आणि शेवंता यांचा मृत्यू दाखवण्यात आला होता. परंतु मालिकेच्या टीजरमध्ये अण्णा नाईक यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातील अकेरी या गावात सुरु आहे.

गूढ कथा, खुनाचा थरार आणि अतृप्त आत्मांचा वावर अशा प्रकारच्या घटनांनी रात्रीस खेळ चाले या मालिकेनं आपला एक वेगळाच प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात नाईक कुटुंबीयांचा इतिहास दाखवण्यात आला होता. दत्ता, सुषमा, अभिराम, छाया, पांडू ही मंडळी इतकी विक्षिप्तपणे का वागतात? याची उत्तर प्रेक्षकांना मिळाली.