नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसत असतानाच लसीकरण होणं हे महत्वाचं असताना गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी कोरोना लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या तीन दिवसात ४ लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.
झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के इतक्या लशी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लशी वाया गेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली होती. देशात कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुटनिक व्ही या लशी उपलब्ध असून लसीकरणाच्या १३४ व्या दिवशी म्हणजेच शनिवारपर्यंत २८ लाख ९ हजार ४३६ जणांचं लसीकरण केलं गेलं आहे.