कोरोनाचा कहर ! देशातल सलग तिसऱ्या दिवशी हजाराहून अधिक कोरोनाबळी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा कहर ! देशातल सलग तिसऱ्या दिवशी हजाराहून अधिक कोरोनाबळी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु असून देशात पहिल्या लाटेतील उच्चांकांच्या दुप्पट रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत नोंदवली गेली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून, मृत्यूचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी हजारांच्या पुढे गेला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांत देशात दोन लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील कोरोना परिस्थितीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णासंख्या वाढीबरोबरच मृत्यूंची संख्या वाढत असल्याचंही समोर आलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातील मृतांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांच्या पुढे आहे. २४ तासांत भारतात १ हजार १८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली पाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनानं हातपाय पसरले असून, दररोज झोप उडवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे.