बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बातमी महाराष्ट्र

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पंढरपूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदा देखील निर्बंध लागू करत, पायी वारीस परवानगी नाकारलेली आहे. तर , राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज (ता. ०३) ताब्यात घेतले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात स्थानबद्ध केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वारकऱ्यांसह त्यांच्य समर्थकांची गर्दी जमली आहे. आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण कोरोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील कोरोना काळजी केंद्रात उपचार सुरू असले, तरी काही प्रमाणात घबराट उडाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे! तीव्र निषेध! अशा शब्दांमध्ये ट्विट करत, देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.