उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग
देश बातमी

उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग

उन्नाव : चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची बातमी उन्नाव येथील बाबुराहा गावात घडली होती. यातील दोन मुलींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, तर एका मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेने संपूर्ण देश पुन्हा हादरून गेला होता. आता याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. दोन मुलींच्या हत्येप्रकरणी,विनय कुमार उर्फ ​​लांबू असं या आरोपीचं नाव आहे. विनय कुमारसोबत त्याच्या एका अल्पवयीन मित्राला युपी पोलिसांनी अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुलींपैकी एका मुलीवर विनय कुमार एकतर्फी प्रेम करत होता. त्याचं शेत या मुलींच्या शेता शेजारीज आहे. बर्‍याच वेळा विनय कुमारने मुलीला (रागिनी) आपला प्रेमाचा प्रस्ताव दिला, पण तिने नकार दिला. प्रेमाला नकार दिल्याने संतप्त झालेल्या विनय कुमारने तिच्या हत्येचा कट रचला. त्याला फक्त रागिनीला मारायचे होते. पण काजल व कोमल यांचा मृत्यू झाला. रागिनीवर कानपूर येथे उपचार सुरू आहेत.

रागिनी नेहमीप्रमाणे काजल आणि कोमलसोबत शेतात काम करत होती. गावातील एका अल्पवयीन मित्रासह विनय कुमार तिथे पोहोचला. त्याने पाण्यात किटकनाशक मिसळून ते बाटलीत भरुन आणलं होतं. सोबत दुकानातून चिप्सही आणले होते. विनय कुमारने ते चिप्स तिघींनाही दिले. त्यानंतर रागिनीने पाणी मागितलं आणि विनयने तिला विषारी पाण्याची बाटली दिली. रागिणीने पाणी प्यायले आणि बाटली काजलला दिली. काजलनेही पाणी प्यायले आणि बाटली कोमलला दिली. अशा रितीने तिघींनीही विषारी पाणी प्यायले. थोड्याच वेळात तिघीही बेशुद्ध पडल्या. त्यानंतर दोघेही तेथून फरार झाले. या घटनेत कोमल आणि काजल यांचा मृत्यू झाला, तर रागिनीवर कानपूर येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गुरुवारी 18 फेब्रुवारी रोजी एकाच कुटुंबातील 15, 14 आणि 16 वर्षांच्या तीन मुली चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्या तिघी घरी न आल्यानं कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. तिघींनाही एका ओढणीने बांधण्यात आलं होतं. घटना उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांनी गावकरी आणि पीडित मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली.