#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
देश बातमी

#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील

नवी दिल्ली : ”आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झालेला नाही. असं असतानाही ते दिल्लीला जाऊ लागले असता त्यांच्यावर वॉटर कॅनन आणि अश्रुधूर वापरण्यात आला. आमच्या ज्येष्ठांच्या आणि शेतकऱ्यांच्या पगड्या अशापद्धतीने उडवण्यात येणार असतील तर असे पुरस्कार आणि पदकं ठेऊन आम्ही काय करावे? आम्हाला असे पुरस्कार नकोत. आम्ही ते परत करणार आहोत, ‘ अशा शब्दात भारताचे माजी बास्केटबॉलपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता सज्जन सिंह चीमा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणाऱ्यांच्या यादीत माजी खेळाडू आणि पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी खेळाडूंचाही समावेश झाला. शेतकऱ्यांना पाठींबा देत या माजी खेळाडूंनी सरकारला पदकं परत करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर करणं कोणत्याही अर्थाने योग्य नसून आम्ही या गोष्टीचा विरोध करत आहोत, असं या खेळाडूंनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी (ता. १) ३५ पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली.

तर आता दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मागील काही दिवसांपासून सज्जन सिंह चीमा हे खेळाडूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी खेळाडूंची मोर्चेबांधणी करत आहेत. चीमा हे पंजाबमधील आपल्या सहकारी खेळाडूंच्या संपर्कात आहेत. याचबरोबर ते शेतकऱ्यांच्या आंदोलना पाठींबा देण्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार राष्ट्रपतींकडे परत करावेत, असं आपलं म्हणणं पटवून देत आहेत.

चीमा यांच्या या मोहिमेला काही प्रमाणात यश आलं असून ३० हून अधिक माजी ऑलिम्पिक तसेच इतर मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करुन पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये गुरमेल सिंह, सुरिंदर सिंग सोढी यांचही समावेश आहे. हे दोघेही १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या संघाचे सदस्य होते. या संघाने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं.

पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतास सिंह, अर्जुन पुरस्कार विजेते माजी बास्केटबॉलपटू सज्जन सिंह चीमा, हॉकी खेळाडू राजबीर कौर यांच्यासहीत ३० खेळाडू राष्ट्रपतींकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत. राष्ट्रपतींनी वेळ न दिल्यास हे खेळाडू ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन आपले पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेऊन येणार आहेत. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी केंद्र सरकराने आणि हरयाणा सरकारने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करणं योग्य नव्हतं असं मत या खेळाडूंनी व्यक्त केलं आहे.