‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’
बातमी महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’

सातारा : ”देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो,” असे वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबतीत उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना उदयन राजे म्हणाले की, ” शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी आधी उत्तरं द्यावी. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

उदयनराजे पुढे म्हणाले की, ”जिल्हा न्यायालयातही तारीख देतात. मग सुप्रीम कोर्टाने तारीख दिली नाही. राज्य शासनाचा वकील हजर राहात नाही, असा आरोपही त्यांनी केला. इतरांना जसे आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं उदयनराजे म्हणाले. देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचे आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केलं. ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. आता तुम्ही सत्तेत आहात ना मग काम करा ना.” अशा शब्दात त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला.

”छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवायचा आणि एखाद्या समाजाला दाबायच काम केलं जात आहे. मराठा समाजात जन्माला आलो असलो तरी छत्रपतींच्या विचाराने चालतो. ते सर्व धर्माला सोबत घेऊन चालायचे. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळं होणार, झालं असं आश्वासन दिलं जातं. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.

उदयनराजे म्हणाले की, या प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. इतरांचं आरक्षण कमी करून आम्ही आरक्षण मागत नाही. सर्वधर्म समभाव अशी भूमिका छत्रपतींची आहे. आता जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार खासदारांची नैतिकता आहे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. असेही त्यांनी नमूद केले.