जल जीवन मिशन ठरणार ग्रामीण भागासाठी वरदान; कारण…
पुणे बातमी

जल जीवन मिशन ठरणार ग्रामीण भागासाठी वरदान; कारण…

पुणे (Pune) : केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) हाती घेतले आहे. या मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवाय अमृत अभियानातून शहरी भागातील नागरिकांना पाणी पुरविण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही अभियानाच्या पुर्णत्वासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह अधिकारी, अभियंता आणि नागरिकांचा सहभाग आवश्‍यक असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी व्यक्त केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) तीन दिवसीय ५५ व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचा समारोप आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, ‘आयवा’चे अध्यक्ष सुभाष भुजबळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. मथियालगन, राष्ट्रीय महासचिव डॉ. दयानंद पानसे, संयोजन समिती सचिव व अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, आयवा पुणेचे सचिव के. एन. पाटे, डॉ. पराग सदगीर उपस्थित होते.

देशभरातून आलेल्या प्रतिनिधींना महाराष्ट्राची सांस्कृतिक कला दाखवण्याच्या उद्देशाने यावेळी महाराष्ट्राची लोकधारा, मेलडी मेकर्स हे दोन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट रिसर्च पेपर, पोस्टर सादर करणाऱ्यांचा, तसेच उत्कृष्ट स्टॉलधारकांचा सन्मान करण्यात आला.

केंद्र व राज्याने आणलेल्या योजना राबविताना अभियंत्यांनी नावीन्याची कास धरावी. पाणी गळती, ऊर्जेचा अल्प वापर यावर विचार केला पाहिजे. जलस्रोत संवर्धन व वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ‘एआयसीटीई’च्या सहयोगाने पाणी व्यवस्थापनात काम करणाऱ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे योजनेच्या यशस्वितेसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद