राज्यात नव्या रुग्णांचा आकडा घटला तरी मृत्यू तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात नव्या रुग्णांचा आकडा घटला तरी मृत्यू तांडव सुरुच

मुंबई : राज्यातून नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीचे आकडे काही प्रमाणात दिलासादायक दिसत असले तरी मृत्यूचे तांडव सुरुच आहे. मात्र दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. एवढंच नाहीतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक दिसून येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र अद्यापही करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही रोज मोठ्या संख्येने भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार ३७१ रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर २९ हजार ९११ नवीन रूग्णांचे निदान झाले. याशिवाय, ७३८ रूग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतली आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८५ हजार ३५५ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २१ लाख ५४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ९७ हजार ४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९ लाख ३५ हजार ४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३ लाख ८३ हजार २५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.