दहावीचा निकाल १५ जुलैनंतर; मूल्यमापन पद्धतीनुसार तयार होणार निकाल
बातमी महाराष्ट्र

दहावीचा निकाल १५ जुलैनंतर; मूल्यमापन पद्धतीनुसार तयार होणार निकाल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाईन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाने हा आराखडा तयार केला आहे. शाळांनी या आराखड्यामध्ये गुण कसे भरायचे आहेत, या संदर्भांत एक व्हिडिओ तयार केला आहे.

दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, असे अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.