पूजाचा वडिलांचा गौप्यस्फोट; पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती, पण…
बातमी महाराष्ट्र

पूजाचा वडिलांचा गौप्यस्फोट; पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती, पण…

पुणे : पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती, तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही”.असा गौप्यस्फोट पूजा चव्हाणच्या वडिलांनी केला आहे. तसेच, आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “पूजाने तीन वर्ष भाजपासाठी काम केलं. तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही. पण नुसती बदनामी सुरु आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. फक्त बदनामी सुरु आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे भाजपा संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपाने पूजा चव्हाणचा मुद्दा आक्रमकतेने मांडत असताना तिच्या वडिलांनी मात्र अनेक गंभीर आरोप केले आहेत. “पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतलं होतं, यामध्ये तिचं खूप मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरं काही तरी करते असं ती म्हणाली होती,” अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणी अनेक नाव समोर येत आहेत, यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, ”माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नाही. तरीही कोणी कोणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? असंही त्यांनी विचारलं आहे.

दरम्यान मंत्र्यांचं नाव जोडलं जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, “मंत्री असो किंवा कोणीही असो तपासाअंती नाव आलं तर कारवाई होईलच. पण सध्या कोणाचं नाव घेऊ शकत नाही,” असंही त्यांनी म्हंटल आहे.