मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय : चंद्रकांत पाटील
राजकारण

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय : चंद्रकांत पाटील

पनवेल: एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. मात्र, यावरुन भाजपमध्ये खदखद आणि नाराजी असल्याचं दिसून येत आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पनवेलमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद दिल्लीत उमटल्याचं पाहायला मिळतंय. पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढण्याचे आदेश दिल्लीतून देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

‘केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानं आपल्या सर्वांनाच दु:ख झालं’
कार्यकारिणी बैठकीत बोलताना पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षात राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांनीच पाहिलं. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झाला. तो बदल होत असताना योग्य संदेश देईल अशा व्यक्तीची गरज होती. असं असतानाही आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानं आपल्या सर्वांनाच दु:ख झालं. पण ते पचवून आपण पुढे गेलो’.

शिंदे गट नाराज होण्याची भीती, भाजपची सारवासारव
पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर प्रदेशाध्यक्षांची अशाप्रकारची प्रतिक्रिया भाजपमध्ये अपेक्षित नाही. तसंच पाटील यांच्या वक्तव्यानं शिंदे गट नाराज होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ काढण्याचे आदेश केंद्रीय पातळीवरुन देण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून सावरासावर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता आमदार आशिष शेलार म्हणाले की पाटील यांनी तेव्हा असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. तसंच पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ बाहेर आलाच कसा? हा अंतर्गत विषय आहे, असं शेलार यांनी म्हटलंय.